वाचक लिहितात   

माध्यमांकडून अतिरंजित वार्तांकन
 
रेडिओ, दूरदर्शन किंवा अन्य कोणतीही समाज माध्यमे असोत, त्यावरून विपर्यास किंवा अतिशयोक्ती न करता, खर्‍या खुर्‍या व विश्वासार्ह बातम्या जनतेपर्यंत पोचवणे अपेक्षित असते; पण अलीकडे दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्याही घडलेल्या प्रसंगाची अथवा बातमीची शहानिशा न करता, बिनधास्त न घडलेल्या प्रसंगाची चित्रफित दाखवून, जनतेची उघडपणे दिशाभूल तसेच फसवणूक करत आहेत. त्याच त्याच चित्रफिती दाखवून जनतेला भ्रमित बनवले जात आहे. त्यामध्ये नावीन्य असायला नको? पहलगाम हल्ल्यानंतर वृत्तवाहिन्यांवरून करारा जबाबच्या नावाखाली कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानच्या शहरांवर हल्ले, नौदलांकडूनही आक्रमण अशा प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज चालवण्यात आल्या. यातील अनेक वृत्तवाहिन्यांनी यातील कोणत्याही बातम्यांची शहानिशा न करता त्या दाखवणे हा गुन्हा आहे. या खोट्या बातम्या दाखवून, समाजमाध्यमे आपली विश्वासार्हता गमावत आहेत; परंतु याचे त्यांना सोयरसुतक देखील नसावे. जनतेची फसवणूक करणार्‍या माध्यमांविरुद्ध कडक कारवाई करणार का?
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
महावितरणने खबरदारी घ्यावी
 
सध्या वादळ, वारा, वावटळ, अवकाळी पाऊस सर्वत्र राज्यात धुमाकूळ घालत आहे. या वादळ, वार्‍यामुळे, वावटळीमुळे विजेच्या तारा तुटत आहेत. विजेचे खांब उन्मळून पडत आहेत. झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर तुटून पडत आहेत. विजेच्या तारा तुटत असल्यामुळे या तारेत वीज प्रवाह असल्याने जनावरे व काही ठिकाणी मनुष्यही या वीज प्रवाह असलेल्या तारेच्या संपर्कात येऊन प्राण गमावत आहेत. हे सर्व प्रकार पाहता वीज वितरण मंडळाने पावसाळ्यापूर्वी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. विजेच्या ताराजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, जेथे विजेच्या तारा लोंबकळत आहेत किंवा विजेच्या तारा खिळखिळ्या झाल्या त्या दुरुस्त करून घ्याव्यात. विजेचे खांब पक्के रोवलेले नसल्यास ते सिमेंट काँक्रिटने पक्के करून घ्यावेत. उघड्या डीपीला कव्हर लावून घ्यावेत. शहरी भागात विजेच्या तारांजवळ वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटून घ्याव्यात म्हणजे झाडात वीज प्रवाह उतरणार नाही व जीवितहानी होणार नाही.
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
 
दहशतवादाविरुद्ध एकत्र यावे
 
भारताला जेव्हा जेव्हा दहशतवादाची झळ बसली, तेव्हा तेव्हा संपूर्ण जगाने एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करावा, असे आवाहन भारताने जगाला केले. दहशतवाद्यांनी केवळ भारतालाच नाही, तर अमेरिकेसारख्या महासत्तेला देखील तडाखा दिला आहे. भारत, रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया इतकेच नाही, तर पाकिस्तानला देखील दहशतवादाची झळ बसली आहे. मध्यंतरी काही काळ शांत असलेले दहशतवादी आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. दहशतवादी सर्वच देशांत दहशतवादी कारवाया करीत आहे. त्यामुळे दहशतवाद ही आता एका देशाची समस्या राहिली नसून ती वैश्विक समस्या बनली आहे. दहशतवादापासून कोणताच देश अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे याचा मुकाबला सर्व देशांनी मिळून करायला हवा. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केली तर संपूर्ण जगाने भारताने पाठिंबा द्यायला हवा. दहशतवादाविरोधातील सध्या सुरु असलेल्या भारताच्या मोहिमेस जगाने पाठबळ द्यायला हवे. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एक व्हायला हवे. जोवर दहशतवादाविरोधात संपूर्ण विश्व एक होत नाही, तोवर दहशतवादाचा हा भस्मासूर रोखणे कठीण आहे. दहशतवादी म्हणजे मानवतेचे शत्रू आहेत. या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एक होणे ही काळाची गरज आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
पाकिस्तानकडून खोट्या वृत्तांचा मारा
 
भारतीय सैन्याने पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले करून भारताविरुद्ध केलेल्या आगळिकीला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. अशातच आता पाकिस्तानने खोट्या बातम्यांचा आसरा घेतला असून पाकिस्तानकडून सोशल मीडियावर बरेचसे जुने फोटो आणि व्हिडीओ, ताज्या युद्धाचे फोटो आणि व्हिडीओ म्हणून शेअर केले जात आहेत. उदाहरणार्थ, २०२० मध्ये लेबनॉनमधील बैरूत येथे झालेल्या स्फोटक हल्ल्याचा व्हिडिओ भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा म्हणून दाखवला गेला. २०२२ मधील रशिया-युक्रेन संघर्षातील एक मानवरहित विमानाचा (यूएव्ही ड्रोन) फोटो, भारतीय सैन्याच्या ताज्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याने अडवल्याचा फोटो म्हणून शेअर केला आहे. २०२३ मध्ये मॉस्कोमधील एका लष्करी स्थळावर लागलेल्या आगीचा जुना फोटो पाकिस्तानी क्षेपणास्त्राने भारतीय एस-४०० ला धडक दिल्याचा म्हणून शेअर केला आहे. भारतीय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) यातील खोटेपणा उघड केला असून जनतेने त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले आहे.
 
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
मुलांना करिअर निवडीचे हवे स्वातंत्र्य
 
नुकताच बारावीचा निकाल लागला आणि प्रत्येक घरात एकच चर्चा सुरू झाली आहे. ’आता पुढे काय?’, ’इंजिनिअरिंग की मेडिकल?’, ’सायन्स की कॉमर्स?’ काही पालक आनंदी आहेत, काही चिंतेत आहे, तर काही अपेक्षाभंगाने खचलेले आहेत; मात्र या सार्‍या भावनांमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे बहुतेक वेळा मुलांच्या मताला, इच्छेला आणि स्वप्नांना दुय्यम स्थान दिले जाते.
 
आजची तरुण पिढी ही केवळ गुणांवर नाही. त्यांची स्वप्ने वेगळी आहेत, विचार वैश्विक आहेत, आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली कारकीर्द घडवायची आहे. कोणाला अभिनय आवडतो, कोणाला क्रिकेट, संगीत, संगणक, विज्ञान, कोणाला इतिहास, अभिनय तर कोणाला समाजसेवा. अशा विविध स्वप्नांना संधी द्यायची असेल, तर पालकांनी त्यांच्या मनावर आपल्या अपेक्षांचा दबाव टाकण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन करत स्वातंत्र्य दिले पाहिजे.
 
करिअर निवड ही आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी आहे. ती पायरी मुलांनी स्वतःच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि विचारपूर्वक चढली पाहिजे. पालकांनी आपले अनुभव, मार्गदर्शन आणि प्रेम नक्की द्यावे; पण शेवटी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मात्र मुलांकडेच असले पाहिजे. जबरदस्तीने एखादे क्षेत्र निवडून दिले, तर सुरुवातीला यश मिळाले तरी त्या यशात आनंद नसतो आणि आनंदाशिवाय मिळालेले यश हे अपुरेच ठरते.
 
आज जग झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक व्यवसायांबरोबरच डिजिटल मीडियामधून, स्टार्टअप्समधून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाइन, डेटा सायन्स अशा नव्या वाटांमधून मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या नव्या वाटा आपल्या मुलांना खुल्या मनाने शोधू द्याव्यात.पालकांनी मुलांना विचारण्याची सवय लावली पाहिजे तुला काय आवडते?, तू कोणत्या गोष्टीत आनंदी असतोस?, तुला काय करून दाखवायचे आहे? यातून संवाद सुरू होईल आणि त्यातून योग्य मार्ग सापडेल. 
 
आकाश हरिभाऊ भोरडे, पुणे.

Related Articles